भक्ती आणि शक्ती, चारित्र्य आणि चैतन्य यांचा संगम : गुरुजी गोळवलकर
'देवाचा शोध की देशाची सेवा' या दोन गोष्टींच्या संभ्रमात एक तेवीस वर्षाचा तरुण पडला होता. या वयातील त्याचे मित्र आपले उमलते आयुष्य सुखासमाधानात, ख्याली खुशालीत वा मौज मजेत घालवीत होते. या तरुणाच्या सभोवतालीही तशी प्रलोभने होती. पण हा युवक मात्र खंबीरपणे त्या लौकीक सुखाना लाथाडून 'देश की देव' या विवंचनेत पडला होता. आत्मोन्नती व मोक्षप्राप्तीसाठी हिमालयात जाऊन तप करावे, का आपल्या देशासाठी, त्याच्या कल्याणासाठी अवघे आयुष्य समर्पित करावे. याच द्विधा मनस्तीतीत तो होता. मात्र कोणत्याही वाटेवरून गेले तरी त्यामध्ये अपरंपार कष्ट, काटेरी वाटचाल व खडतर साधना आहेच, याचीही त्याला पूर्ण जाणीव होती. विचारांती या युवकाने ठाम निर्धार केला की, हिमालयात न जाता येथेच या भवसागरात राहूनच संन्यस्त वृत्तीने मी माझी कर्मे पार पाडीन. या तेजस्वी तरुणाचे नांव होते ' माधव सदाशीव गोळवलकर'. १९ फेब्रुवारी १९०६ रोजी नागपुरमधील रामटेक येथे एका शिक्षकाच्या पोटी त्यांचा जन्म झाला. एकूण नऊ अपत्यांपैकी वाचला फक्त एक. माधव! त्यामुळे आई-वडिलांचा त्यांच्यावर खूपच जीव होता. १९२२ मध्ये म्यॅट्रिक झाल्याव