शाळा सुटली ...पाटी फुटली.
प्रा. वि.द. घाटे यांचे ' कांही म्हातारे व एक म्हातारी' हे पुस्तक मला खूप आवडते. विशेषतः त्यातील प्रो. देसाई यांचावरील 'एक म्हातारा ' हा लेख तर माझ्या मनांत घर करून बसला आहे. स्वतःच्या ज्ञानात आणि संशोधनात मग्न असलेल्या देसाईसरांच्या विद्ववत्तेसमोर सर्वजण दिपून जात असत. त्यांच्या दैवत असलेल्या शंकराचार्यांच्या अद्वैत मताचे ते जेव्हां समर्थन करीत तेव्हां त्यांच्या वाणीतून जणू त्यांच्याविषयीच्या भक्तीचे उमाळे फुटत असत. आणि आपल्यालाही जाणीव होत असे ' गुरु ' या व्याख्येची ! त्यांच्यातील तपश्चर्येची! त्यांच्या दीर्घ अश्या ज्ञान लालसेची ! प्रा. घाट्यानी त्यांचे जे शब्दचित्र आपल्या भाषेत असे कांही रेखाटले आहे, की ते वाचतानाच आपला उर अश्या गुरूंनी अभिमानाने भरून येतो व त्यामध्ये आपण आपले गुरु पाहू लागतो. असेच कांही गुरुजन शालेय शिक्षणात आमच्या वाट्याला आले होते. शिक्षण हा व्यवसाय नसून ते एक ज्ञानदानाचे पवित्र कार्य आहे, असे समजून त्यात स्वतःला झोकून देणारे ! एक निरोगी अशी विदवत्त पिढी तयार करण्यासाठी अविरत झटणारे, जे आजच्या काळात पाहणे दुर्लभ झाले आह...